श्री छत्रपती साखर कारखान्यावर अजित पवार यांचे वर्चस्व   

बारामती,(प्रतिनिधी) : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाण्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री जय भवानी माता पॅनलच्या उमेदवारांनी श्री छत्रपती बचाव पॅनलच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला असुन सभासद शेतकरी यांनी कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्चस्वाला पसंती दिली. 
 
कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारखान्याची निवडणूक जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी एकत्र येत श्री जय भवानी माता पॅनल तयार केला होता तर छत्रपतीचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, माजी संचालक तानाजीराव थोरात, मुरलीधर निंबाळकर यांनी एकत्र येत श्री छत्रपती बचाव पॅनल उभा केला होता. दोन्ही पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली, मात्र मतदारांनी श्री.जय भवानी माता पॅनलला पसंती देत अजित पवारांच्या नेतृत्वाला साथ दिली.  श्री छत्रपती बचाव पॅनल ला कारखान्याच्या सर्व जागांवर निवडणूक लढवता आली नाही, त्याचबरोबर त्यांच्या दोन उमेदवारांनी पवार-जाचक यांच्या पॅनलला पाठिंबा दिला. तिथेच कारखान्याच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले होते. 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी मेळावा घेत पृथ्वीराज जाचक यांच्या नावाची अध्यक्ष पदासाठी घोषणा केली होती. निवडणुकीपूर्वीच जाचक यांचे नाव अध्यक्ष पदासाठी जाहीर केले होते, त्याचा फायदा असा झाला की जाचक- पवार पॅनल वरती सभासद मतदार यांनी विश्वास ठेवून श्री जय भवानीमाता पॅनलला भरभरून मतदान केले.
 
निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. तब्बल ही मतमोजणी तब्बल २१ तास चालली छत्रपती कारखान्याच्या एकूण २२६८१ मतदारांपैकी १६ हजाराच्या आसपास मतदारांनी मतदान केले. ७५ टक्के मतदान झाले होते. मतमोजणीला सुरुवात होताच श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवारांनी आघाडी घेतली होती ती आघाडी मतमोजणी संपेपर्यंत कायम राहिली. 
 

Related Articles